अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महात्मा फुलेंचा सत्यशोधक वारसा जपणे काळाची गरज : ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव

इतरांना सांगा.

इस्लामपूर
“ज्या देशात दगडाला देव म्हणून किंमत दिली जाते, तिथे बुद्धिमान माणसाला किंमत उरत नाही. महात्मा फुले यांनी जातीच्या आणि स्त्रियांच्या गुलामगिरीवर प्रहार करून सत्य आणि नीतीलाच जगण्याचा आधार मानले. आजचा समाज शिकलेला असूनही भोंदू बाबा, बापू आणि कर्मकांडांच्या जाळ्यात अडकला आहे, ही खेदाची बाब आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व ज्येष्ठ संपादक मा. ज्ञानेश महाराव यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर, प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यान व ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या महात्मा फुले विशेषांकाचा’ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड. एन. आर. पाटील होते.

ज्ञानेश महाराव पुढे म्हणाले की, “आजचा सुशिक्षित समाज भोंदूंचे स्टेटस ठेवण्यात धन्यता मानतो, पण आपल्या आयुष्याचे शिल्पकार असणाऱ्या महापुरुषांचे विचार विसरत चालला आहे. फुले दांपत्याने आधुनिक काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे बीज रोवले, तोच क्रांतिकारी वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.”

अध्यक्षीय भाषणात ॲड. एन. आर. पाटील यांनी समाजात वाढत्या अंधश्रद्धेबद्दल चिंता व्यक्त करत मोठ्या सामाजिक सुधारणेची गरज प्रतिपादित केली.या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा महात्मा फुले विशेषांक’ प्रकाशित करण्यात आला. व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी गेली ३६ वर्षे अविरत सुरू असलेल्या या वार्तापत्राच्या वाटचालीचा आणि विशेषांकाचा परिचय करून दिला.

याप्रसंगी अंनिसमधील योगदानाबद्दल संस्थेच्या सचिव सरोजमाई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. एस. के. माने (राज्य कार्यकारिणी सदस्य) आणि शशिकांत बामणे (वाळवा तालुका कार्याध्यक्ष) यांची निवड झाल्याबद्दल ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय दीपक कोठावळे यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन डॉ. अलका पाटील व प्रा. किरण पाटील यांनी केले. उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य ॲड. महेश पाटील,मा. प्रशांत पाटील, मा. संगीता पाटील, मा. विशाल पाटील, डॉ. अशोक भोईटे, अरुण कांबळे, एल डी पाटील, भाई दिगंबर कांबळे, सुनील भिंगे अनिस आटपाडी, जगदीश काबरे, बाळू माळी कोल्हापूर अनिस, चंद्रकांत वंजाळे सांगली अनिस, ए डी पाटील, काका हलवाई, श्री भगत, रघुनाथ पवार बलवडी,उमेश कुरळकर, अभिजित शिंदे , शेतकरी कामगार पक्ष, मराठा सेवा संघ सांगलीचे मान्यवर कार्यकर्ते, यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. एस. के. माने, डॉ. राजेश दांडगे,प्रा. अजित पाटील, प्रा. पी. एच. पाटील , निलेश जगताप यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

इतरांना सांगा.