वटपौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वसई शाखेच्या वतीने सोमवारी (दि. २९) परिसरातील विविध शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. थंडगार पाऊस आणि आल्हाददायक वातावरणात कार्यकर्त्यांनी ‘वडासोबतच कोणतेही एक झाड लावूया’ हा संदेश देत हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत वृक्ष प्राधिकरण विभाग वसई-विरार महानगरपालिकेतर्फे मिळालेल्या जंगली वृक्षांची रोपे तसेच अंनिस ने खरेदी केलेल्या वृक्षफळे झाडे रोपाची लागवड करण्यात आली. यामध्ये जि. प. शाळा दहिसर, सरस्वती हायस्कूल फणसपाडा,वैतरणा सिद्धिविनायक हायस्कूल बरफपाडा, कणेर सामंतपाडा येथील स्मशानभूमी पूनमनगर विरार प स्मशानभूमी,नवीन विवा काँलेज रोड पूनम अलफा हौ.सो परिसर आणि भाताणे काजूपाडा येथील रस्त्याच्या बाजूला अशा विविध ठिकाणी उत्साहाने वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व अंनिसचे पालघर जिल्हा प्रधान सचिव संदेश घोलप, वसई शाखेचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण, प्रधान सचिव प्रिता श. पाटील (केंद्रप्रमुख)जि.प.शिक्षण विभाग यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते श्री. बाळू पारधी यांनी केले होते. वृक्षारोपणासोबतच उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) सारख्या गंभीर संकटाचा सामना करण्यासाठी भविष्यात कोणती पावले उचलली पाहिजेत, याविषयी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व उद्बोधन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे या प्रसंगी सांगण्यात आले.
2026-06-30


